आपल्या बेसिकमध्ये प्रोब्लेम आहे का? २३/३/२०२०


आपल्या बेसिकमध्ये प्रोब्लेम आहे का? २३/३/२०२०

कोरोनाचे जगभर थैमान सुरु असतांना आपल्या देशातील काही राज्ये कशी काय सुरु आहेत हा यक्षप्रश्न पडला आहे. केवळ ८ ते ९ राज्ये कालपासून अंशतः किंवा पूर्णपणे बंद केली आहेत. हे असे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी अनेक आवाहने, विनंतीवजा इशारे आणि आदेश ही देण्यात आलेच होते. मात्र या सगळ्याचे गांभीर्य कळावे असे बेसिकच आपल्यात मिसिंग आहे. जनता कर्फ्यू लागू होणार आणि शहरे बंद होणार कारण सामाजिक संसर्ग टाळावा. आम्ही मात्र हजारोच्या संख्येने रेल्वे, बसेस मधून प्रवासच करत होतो. परवा अनेक रेल्वे स्थानके तोबा गर्दीने भरली होती. एकीकडे विलगीकरण, चाचणी, ५ % कर्मचारी, शाळा कॉलेज बंद अशी यंत्रणा काम करत असताना हजारो  बेजाबदार लोक मात्र गर्दी करत होते. केवढे हे भयानक चित्र आहे.

काल जनता कर्फ्यू छान पार पडला. जनतेने काळजी घेत तब्बल १४ तास घरात बसून दाखवले. अगदी गाव, नगर, महानगर यात सहभागी झाले. मिडियाचे काम वाखाणण्याजोगे होते. सर्व रिकामी शहरं दाखवून आज आपण सर्वांनी मोठा पराक्रम केला असा आभास होत असेल सर्वाना. हे चित्र सुखावणारं होतं. त्यातच महाराष्ट्र सरकारने तो जनता कर्फ्यू सकाळपर्यंत वाढवला. एवढंच नाही तर कलम १४४ लागू करून तो अनिश्चित काळासाठी निश्चित केला.  

सायंकाळी ५ नंतर जे चित्र पहावयास मिळाले ते हताश आणि निराश करणारे होते. जमावबंदी संपली आणि लोक मुर्खासारखे एकत्र येत थाळीनाद करू लागले. काही ठिकाणी जुलूस काढावा तसा प्रकार तर काही ठिकाणी चक्क घोषणा दिल्या गेल्या. काहीजण तर सामूहिक नृत्य करू लागले. हातात झेंडे घेऊन गाणी गाऊ लागले. म्हणजे असे झाले की सुरुवात लोकांनी सुरुवात सोशल डीस्टन्सिंग ने केली आणि सांगता सोशल  गॅदरिंगने.

हा सगळा कहर आहे कारण आपल्या बेसिकमध्ये प्रोब्लेम आहे असे वाटते. बोलायचे झाले तर एकदा घरात बस, बाहेर पडू नका. आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत. हा कम्युनिटी पर्यंत आला तर आपण फार मोठ्या संकटात सापडू. आज स्पेन, इटली आणि चीन सारखे विकसित देश नांगी टाकून बसलेत आणि आपण मात्र अजूनही बेफिकीर. मान्य आहे ज्याला त्याला रोजीरोटी आहे, कामे आहेत आणि बरच काही आहे पण एवढी सामान्य गोष्ट जर कळत नसेल की मी बाहेर पडून माझे आयुष्य तर धोक्यात टाकतोच आहे पण सोबत बोनस म्हणून की काय अनेकांना मी कळत नकळत बाधित करू शकतो. एवढा बेसिक सेन्स का नाही आपल्याकडे.

मुळात आपल्याकडे अश्या कोणत्याही आपत्तीमध्ये कसे वागावे, कसे वागू नये याचे कोणतेच ट्रेनिंग कोणत्या शाळेत, कॉलेजात  दिले जाते का  ही शंकाच आहे. पूर आला तर सगळं बुडेपर्यंत आम्ही वाट  पाहतो, नदीला पूर आला तर मोबाईल घेऊन फोटो काढत जीव धोक्यात घालतो. अगदी कोणत्याही शाळेत आणि कॉलेजमध्ये न  सांगता जर भूकंपाचे ड्रील घेतले तर कळेल किती तयार आहोत आपण. एक दिवस घरात बसले तर कसले सेलिब्रेश? कसली ही मानसिकता? किती हे अज्ञान आणि किती ही अपरिपक्वता. आजही भर रसत्यात पचापचा थुंकणारे, नको तिथे कचरा टाकणारे कोण आहेत? काल, परवा  आपल्या मूर्ख जनतेने जो हैदोस घातला आहे त्यावरून एक नक्की की फक्त कायदा आणि पोलीस किंवा तत्सम कठोर यंत्रणाच फक्त काम करू शकते. आपल्याकडे कॉमनसेन्स इज व्हेरी अनकॉमन.

असो, आता मात्र कलम १४४ लावण्याने किमान गर्दी होणार नाही. जमावबंदी असल्याने मूळ उद्देश साध्य होईल असे म्हणूया. कोरोनाशी नाईलाजाने का होईना लढूया. लक्षात असू द्या की आपला वूहान, स्पेन  किंवा इटली होऊ द्यायचा नाही. तरी शेवटी बेसिक प्रश्न हाच आहे.  आपल्या बेसिक मध्ये प्रोब्लेम आहे का हो?

-- डॉ.  सचिन शंकर गाडेकर

Comments

  1. Nice work Sachin..Hope people will take seriously..����

    ReplyDelete

Post a Comment