शेगांव .....अनोखा अनुभव... भाग २

शेगांव .....अनोखा अनुभव... १८/५/१६ भाग

बुलढाणा मागे पडले न निरव शांत असे जंगल लागले. मनात चर्र व्हावं असं सभोवतीच चित्र. गाडी जोरात चालवू शकत नाही कारण नेहमीच. किमान दहा मिनिटे वा जास्त काळाने एखादी ट्रक वा ट्राव्ल्स पास होत होती. भीती नाही पण चिंता नक्कीच होती. सकाळी ५.३० ला शेगाव आले. चटकन रूम बुक करून आराम करावा हे ठरले. या प्रस्तावास तर सगळे सहमत झाले. (काही ठिकाणी एकमत होणे म्हणजे लोकशाही..) सुर्यनारायण स्वत: तळपत पुढे निघाले. अभ्यंगस्नान अन बाकीचे सोपस्कार करत खाली आलो तर सर्वत्र माऊली चला, माऊली शांतता पाळा वगैरे. मृदू स्वर कानी आले. साडे दहा अकरा ला मंदिर परिसरात पोहोचलो तर भयाण तप्त चित्र. सगळे घामाने चिंब, डोक्यावर रुमाल, हातात पेपर वा उपरणे. त्यात ४४% गर्मी काय असते हे प्रतीत होत होते. आपल्या सारख्यांना हे अवघड जात होते पण जे इथेच आहेत त्यांना तर काय भोगाव लागत असेल हा विचारच ना केलेला बरा. मंदिरात जाणे, लांब लांब रांगा आम्हा शिर्डीकरांना फारसे काही वाटत नाही तसे. मुखदर्शन झाले न समाधान मानून सगळे चटकन परत निघाले.
या गर्मीत डीहायड्रेशन होणार नाही त साठी नुसता मारा चालू होता त्या थंड पाणी अन लिक्विड चा. कितीही घ्या कमीच. स्वच्छता असावी  तर अशी. खूप दिवसापूर्वी प्रती बालाजी ला अशी  स्वच्छता अन स्वयम शिस्त पाहायला मिळाली. धर्म अन व्यवहार यांचे अमोल निदर्शन. मंदिर परिसरात आम्ही बसलो न थोडा आवाज वाढला गप्पांचा. एक स्वयंसेवक आला अन एक छोटा बोर्ड दाखवला तो ही एक दम प्रसन्न मुद्रेने. ‘कृपया शांतता पाळावी’ काहीही प्रतिक्रिया न देता सगळे शांत. क्या बात है! मंदिर परिसर सोडला अन कूच केले आनंदसागर विहाराकडे. कसले हिरवेगार वृक्ष, वेली अन खास सोय. सर्वांनी ताव मारला तो प्रसादवर. भक्तांसाठी सेवार्थ असलेले मिष्टान्न नेहमी वेगळेच असते. त्यासाठी दिलेली रक्कम फक्त एक रक्कम न राहता समाधान बनते. जेवणापूर्वी पण एक सेवेकरी हळूच एक पाटी दाखवत ‘जेवण उष्टे टाकू नका, आपली पाने आपणच उचलावी वगैरे’ हसत मुखाने निघून गेला. जेवण झाले अन हिरवेगार गार्डन मन प्रसन्न करून गेले. त्या प्रस्न्नेत बाधा आणली त्या कर्मठ सुर्यनारायनाने स्वत:चे अस्तित्व इतके प्रकट करत होता की तो मेसेज आठवला..(अरे सूर्य देव! अपनी डिग्री दिखाओ ऐसा सब मोदिजी से पुछ रहे है , आप काहे अपनी डिग्री दिखा रहे ..) 
मत्स्यालय पाहिलं अन एक मस्त दाट झाडी पाहून त्या ओल्या गवतावर सगळे लोळत गप्पा मध्ये रंगले. काहीच वेळात चक्क घोरण्याचा आवाज.... जगातील सुखी प्राणी असे आमचे परममित्र झोपी गेले सुद्धा. त्यांचे सुख सर्वांनी पांघरले अन अर्धी प्रजा उन्हाच्या झळाया कमी करण्यासाठी त्या गवतावर लोळले अन झोपी गेले. मधे मधे जर कोणी नेहमीचे नावडते अन कामाचे विषय काढले तर सगळे उचकणार अन म्हणणार ‘अरे इथे तरी विसरा ते काम.’
तीन चार च्या सुमारास परत फिरणे चालू करून, मधे लस्सी, ज्यूस चे सेवन करत परत निघण्याचे फर्मान निघाले. शेवट ट्रेन ने करूया ही सूचना आवडली न लगेच ट्रेन मध्ये स्वर झालो. लहानपण देगा देवा....सगळे कसे मजा करत ते कृत्रिम प्राणी पाहत होते. आमचे तीनही चिमुकले सगळे प्राणी मोजत, ओरडत एन्जोय करत होते. कधी कधी उसने अवसान आणावे लागते हे ही खरच म्हणा. त्या बाळगोपालांसाठी लहान बनत रमून गेलो आम्ही.
परत निघालो त्या आठवणी घेत. गार्डन चे अनेक फोटो घेत. परत आलो ते निवासाकडे अन पहिला चहा चा झुरका फ्रेश करून गेला. (चहा तसा मशीनचा पण काय करणार ? तल्लफ काही ऐकू देईना. तसा मी ठरवलंय की चहा सोडायचा आहे....सोप्प आहे मी तो अनेक वेळा सोडलाय..) सामान आवरत परत निघायचं ठरलं अन जेवण घेऊन परत निघालो.
रात्रीचा तो १०० किमी चा सुनसान प्रवास लवकर उरकावा ही सारथीची इच्छा अन आमचे अनुमोदन. परत निघालो ते धन्यवाद देत न अश्या उन्हाळ्यात ही इतके हिरवेगार पर्यटन उत्तम ठेवता येते ही बाब चर्चा करत. चला ...आता म्हणे पुढची ट्रीप मोठी न दीर्घ आखा म्हणे सगळे गृहमंत्री..(पावसाळ्याची डेडलाईन दिलीय.)
आभार ...

                                                                               --- सचिन गाडेकर

Comments